मंडणगड किल्ला (Mandangad fort)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
14

मंडणगड किल्ला

इतिहास
मंडणगड किल्ला राजा भोज याने बांधला असे म्हटले जाते. १६६१ साली हा किल्ला जसवंतराव दळवी या आदिलशहा सरदारच्या ताब्यात होता. शिवाजी राजे पन्हाळ्यात अडकुन पडले होते, तेव्हा याच दळवींनी विशाळगडाला वेढा दिला होता. उंबरखिंडीत कारतलबखानाचा पराभव केल्यावर महाराज दाभोळकडे निघाले. वाटेत मंडणगड किल्ला होता. शिवाजी महाराज येत आहेत हे समजताच जसवंतराव दळवींची तारांबळ उडाली व मंडणगड व आपली जहागिरी सोडून तो शृंगारपूरला पळून गेला. महाराजांना न लढताच हा किल्ला मिळाला. काही काळ हा किल्ला सिध्दी व नंतर आंग्य्रांकडे होता. १८१८ साली इंग्रजांनी तो जिंकला.बाणकोटचा भुईकोट किल्ला, मंडणगडचा गडकिल्ला तसेच पेशव्यांच्या दरबारी असणारे व पानिपतच्या लढाईसारख्या मोठया आघाता नंतर बुद्धीच्या जोरावर मराठी साम्राज्याला सावरून धरणारे पेशव्यांचे फडणवीस श्री. बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस यांचे मूळगाव वेळास आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे असा ऐतिहासिक वारसा मंडणगड तालुक्याला लाभला आहे. मंडणगड शहरापासून केवळ चार कि. मी. अंतरावर व समुद्रसपाटीपासून ४०० मीटर अंतरावर पूर्वीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या असणा-या किल्ले मंडणगड या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा अशी इच्छा व प्रयत्न नवयुवक तरुण मंडळ व मंडणगडवासीयांचा आहे. अनेक वर्षे या किल्ल्याकडे शासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र मंडणगड तालुक्याला लाभलेले निसर्गसौंदर्य व इतिहासपूर्ण वास्तू साऱ्यांचेच आकर्षण ठरत आहे.

गडावरील पहाण्याची ठिकाणे
मंडणगड किल्ला दोन शिखरांचा आहे. उजव्याबाजूकडील थोड्याश्या उंच शिखरावर फक्त एक पाण्याच टाक पहाता येते. बाकी रान माजलेले आहे. डाव्या बाजूकडील काहीशा सपाट शिखरावर किल्ला आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही, पण त्याच्या बाजूचे बुरुज अजून उभे आहेत. गडावर दोन पाण्याचे तलाव आहेत. गडाची तटबंदी काही ठिकाणी शाबूत आहे. गडावर गणेशाचे जिर्णोध्दारीत मंदिर आहे. गडावरुन सावित्री नदीचे पात्र, रायगड, व वरंधा घाट स्वच्छ वातावरणात दिसू शकतात.माथ्यावर पूर्ण सपाटी असून गडाला बालेकिल्ला नाही. गडावरील शाळेसदृश्य खोलीच्या बांधकामापर्यंत गाडी जाते. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे गणेश मंदिर. हे मंदिर पायथ्याच्या मंडणगड गावातूनदेखील सहज दिसते. मंदिराचे नुतनीकरण झाल्याचे दिसून येते. मंदिराला लागूनच खालच्या बाजूला मोठा तलाव आहे. या तलावात बारमाही पाणी असते. तलावात उतरण्यासाठी पश्चिमेकडून पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या वाटेवर पूर्वी दरवाजा असावा, असे तेथील अवशेषांवरून दिसून येते. गडावर आणखी एक कोरडा मोठा तलाव दिसून येतो. दोन तलावांमधून पुढे गेल्यावर उजवीकडे एक कबर आहे. कबरीजवळच कुलपाच्या आकाराचे काही दगड आहेत. कबर ज्या जोत्यावर आहे ते जोते एखाद्या मंदिराचे असावे, असे वाटते. ही कबर छ. शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ दर्यावर्दी आणि मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान याची असावी, असा समज आहे. या कबरीजवळ एक सुबक कोरीवकाम केलेला दगड आहे. कबरीपासून पुढे डावीकडे एका मोठ्या बांधकामाचे जोते आहे. या जोत्याजवळ सिमेंटच्या चौथऱ्यावर २.५ मी. लांबीची तोफ ठेवलेली आहे. या तोफेजवळील मोठ्या जोत्याशेजारी एक बांधीव चर तयार केलेला दिसतो. हा चर जांभ्या दगडात केलेला असून तो नैसर्गिक नाही. असाच एक चर शाळेजवळ आहे. या चराची लांबी दोन फूट व रुंदी एक फूट असून खोली अंदाजे दोन फूट आहे. हा चर का आणि कशासाठी बांधला असावा, याचा अंदाज येत नाही. गडावर तटबंदीचे अवशेष हे फारच कमी प्रमाणात दिसतात. गडावर बांधकामाची पाच ते सहा जोते आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
14




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu