खर्डा किल्ला
खर्डा किल्ला हा बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला १०० किमी. वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे.शिवपट्टण म्हणलं की शिवा वर अतूट भक्ती असणाऱ्या सरदार निबाळकारांची आठवण होते. मराठयांच्या सर्वात शेवटच्या विजयाला विसरून कसे चालेल. अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लेखक आणि प्रसिद्ध इतिहास अभ्यासक गो.स.सरदेसाई यांच्या मराठी रियासात उत्तर विभाग भाग २ मध्ये लिहितात, “पानिपतच्या संहाराचा चटका महाराष्ट्राच्या अंतःकरणाला जितका ताजा आहे तितकाच खर्ड्याचा विजय मराठ्यांच्या बाहुला आजही स्फुरण चढवतो.”
इतिहास
खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी १७ व्या शतकात केल्याचे पुरावे आपणास सापडतात. गावामध्ये पुरातन गढी(राजवाडा)आहे. देखरेखअभावी तिची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.गावाच्या बाहेर दक्षिणेला एक भुईकोट प्रकारच्या बांधणीचा किल्ला आहे. गावच्या २ ते ८ किमीच्या अंतरावर जागृत बारा जोतिर्लिंग आहेत.खर्डा शहर ही एक मोठी व्यापार पेठ असून येथील सोन्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. ११ मार्च १७९५ ला येथे मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी निजामाच्या बलाढ्य सैन्य शक्तीचा पराभव केला. सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेला ही लढाई झाली. येथील युद्धामध्ये मराठ्यांच्या बाजूने ८० हजार सैन्य होते तर निजामाचे १,३०,००० सैन्य रणभूमीमध्ये होते. या रणसंग्राममध्ये जवळपास ४००० सैनिक मारले गेले. गावच्या पंचक्रोशीमध्ये त्यांच्या समरणार्थ घडवलेल्या वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात. एवढा मोठा विजय यानंतर झाला नाही म्हणूनच या युद्धाला मराठ्यांच्या संयुक्त फौजांचा शेवटचा विजय असे संबोधले गेले.[१] शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेडच्या प्रयत्नाने येथील युद्ध भूमीवर तोफेची प्रतिकृती लोकवर्गणीतून बसवण्यात आली आहे.शिवपट्टण हे खर्डा गावाचे जुने नाव, कालांतराने गावाचे नाव बदलले पण किल्ला आजही त्या नावाने ओळखला जातो. किल्ल्याचे बांधकाम हे सरदार आप्पासाहेब निंबाळकरयांनी १७४३ मध्ये बांधला. निंबाळकर म्हणजे कट्टर शिवभक्त पंचक्रोशीत आज १२ ज्योतिर्लिंग आढळतात त्यांचे ते कट्टर भक्त. जवळपास ४० कि. मी.ची ही परिक्रमा देखील आपण करू शकता. असो, किल्ल्याच्या निर्मितीविषयी ही माहीत ठोक पणे सांगण्यामागचे कारण म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आढळणारा शिलालेख होय.शिवपट्टण हे प्रसिद्ध आहे मराठ्यांच्या शेवटच्या मोठ्या विजयासाठी. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाई जणू हादरली होती. माधवरावांच्या नेतृत्वाखाली पेशवाई सुरू होती परंतु माधवराव जरी सत्त्येवर असले तरी नाना फडणीसांची चतुराई सर्व काही हाताळत होती. पेशव्यानकडे सर्व दक्षिण भारताचा जवळपास कारभार होता त्यामुळे राज्यांकडून वसुली कर ते गोळा करत आणि त्यात राज्यांमध्ये हैदराबादचा निजाम देखील होता. हैद्राबादच्या निजामकडे जवळपास २ कोटी रकमेची वसुली थकली होती. निजामाच्या वकिलाने त्याला असा सल्ला दिला की या रकमेतून फौज उभी करावी आणि मराठ्यांना वसुली न देता त्यांच्याशी युद्ध करावे. निजामाला देखील ते पटले आणि त्याने थोड्याच दिवसात फौज उभी केली.निजामाने भर दरबारात मराठ्यांचा अपमान केला त्यामुळे मराठे देखील संतापले होते. निजाम पुण्याकडे कूच करू लागला. मराठ्यांना ही गोष्ट कळताच पेशवे आणि मराठे एकत्र आले आणि ३० नोव्हेंबर १७९४ ला मराठी फौजा शत्रूला तोंड द्यायला पुण्याच्या बाहेर पडल्या. रत्नापुर ला तळ टाकला गेला आणि मग कशा प्रकारे लढायचं याची तय्यारी सुरू झाली. मराठ्यांचा मुख्य लढाऊ तळ एक पाऊल पुढे घोडेगाव येथे पडला. मराठ्यांचा फौजेचे सेनापती होते परशुराम भाऊ पटवर्धन, त्यांच्या सोबतीला नाना फडणीस ची चतुराई, तोफखाना प्रमुख दौलतराव शिंदे , तुकोजी होळकर आणि दुसरे रघुजी भोसले हे शूर सरदार देखील होते.
किल्ल्यावर प्रवेश करताना
किल्ल्यावर अगोदरच सरकारच लक्ष नसल्याने थोडी ढासळलेली अवस्था आहे त्यामुळे आपण तिथे जाऊन वास्तुना नुकसान होईल असं करू नये बालाघाटच्या डोंगररांगेतील शहर म्हणजे शिवपट्टण अर्थात आजचे खर्डा शहर! गावाच्या दक्षिण बाजूला जी तटबंदी आहे तो म्हणजे किल्ले शिवपट्टण होय. किल्ल्यावर आपल्याला जास्त गोष्टी बघण्यासारख्या नाहीयेत पण शासनाने जर इतिहास निगडित संग्रहालय किंवा यासारख्या काही गोष्टी बनवल्या तर किल्ल्याचा आणि गावाचा नक्की विकास होईल. किल्ला तसा लोकांच्या नजरेआडचा त्यामुळे इथे जास्त गर्दी नसतेच.किल्ल्याच्या भोवती खंदक खोदलेले आहे पण आता त्यातील बरेच ठिकाणी बुजलेल्या अवस्थेत ते आढळते. किल्ल्याला एकूण ४ मुख्य बुरुज आणि २ दुय्यम बुरुज आहेत. दरवाजाची रचना ही २ वेळेस ९० अंशाचा कोण घेत बनवलेली आहे म्हणजे हत्ती दरवाजा मोडू शकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. खूप साऱ्या भुईकोट किल्ल्यांवर ही अशी रचना आहे परंतु प्रत्येकाचे बांधकाम,रचना ही वेगवेगळी असते आणि इतिहास प्रेमींनी ती समजून घेतली पाहिजे. गडाच्या प्रवेशद्वारावर एक शिलालेख लिहिलेला आहे,उर्दू भाषेत असला तरी इतिहास जाणकारांनी त्यावरील मजकूर असा सांगितलाय की हा किल्ला सुलतान निंबाळकर यांनी १७४३ मध्ये बांधलेला आहे.