जीवधन किल्ला
इतिहास
शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. पण याची साक्ष देणारा एकमेव किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जून १६६३ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ‘मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगमनेरजवळ असणा-या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. येथील जमिनीचे वैशिष्ट म्हणजे बांबूची बने. सारे जंगल हे बांबूच्या बनांचे आहे.गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकडामध्ये कोरलेला आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
पश्चिम दरवाज्याने वर गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला ‘कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाईदेवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज-मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठडांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडाचा आकार आयताकृती आहे. वांदरलिंगीच्या कडापासून कोकणचे निसर्गरम्य दर्शनहोते. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्र्वराचे मंदिर, धसईचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात. अशाप्रकारे हा जीवधन किल्ला चार ते पाच तासांत पाहून होतो.