What is god? where does he is? How he looks?, these are some questions almost every human being have at some point of time in their life. The first thing to say is that God is much ‘bigger’ than us in every sense. So we can never completely describe him or understand him. only true saints can realize, can understand and can help others to search for it.
देव म्हणजे काय ? आणि खरा देव कोण ?
मनुष्य जन्माला आला, त्याला समज आली कि त्याला एकच प्रश्न पडतो ‘देव म्हणजे काय?’, ‘खरा देव कोण?’ आणि ‘ मला देवाला प्राप्त करून घ्यायचे आहे परंतु तो कसा प्राप्त होईल ?’ यातच तो संभ्रमित असतो. विविध दैवते, विविध संप्रदाय, विविध उपासना, विविध व्रते, वैकल्ये, अनेक पंथे, आणि अनेक मते आहेत पण हे सर्व आपणाला देव कोण आहे कसा आहे हे सांगावयास पुरेसे आहेत काय ? आणि हे आपणाला कळतच नाही कारण हि अनेक शास्त्रे मार्गदर्शनाऐवजी आपसात भांडताना दिसतात. प्रत्येकाला आपले शास्त्र व आपलाच देव खरा वाटतो. देवाबद्दल मार्गदर्शन खऱ्या संताकडून प्राप्त होते असेही कळते; परंतु खरे संत जे भगवंताला जाणतात, ज्यांनी स्वत: अनुभव घेतला आहे,शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे जाणले आहे, त्याचा सारासार विचार करू शकतो ते संत आहेत कुठे ?
खऱ्या देवाचे ज्ञान ज्याला झाले आहे त्याच्या संगतीत जर आपण राहिलो तर खरा देव कळू शकतो.
समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
जेणे केले चराचर | केले सध्याही व्यापार ||
सर्व करता निरंतर | नाम ज्याचे ||
ज्याने हि सर्व सृष्टी निर्माण केली; या सृष्टीचे व्यापार, व्यवहार ज्याच्यामुळे चालतात तो कर्ताकरविता देवच होय. हे जग निर्माण कर्ता सर्वांमध्ये असूनही निराळाच आहे. आपण ज्याला देव म्हणतो त्या देवाला निर्माण करणारा सुद्धा वेगळाच आहे; त्याला जाणणे हेच खरे ज्ञान होय. निर्गुण निराकार असा हा परमात्मा आहे तरी कोण? हा प्रश्न पुन्हा पडतोच. तर खरा संत सांगतो, आपल्यातील आत्मस्वरूप हाच खरा देव आहे जो सर्व विश्व व्यापणारा तोच आपल्या अंतर्यामी वास करतो. पण हे सहजपणे आपल्याला कळत नाही. सर्व सोडून म्हणजे मीपणा सोडून माझा शोध घ्या, मी तुमच्यात आहे, असे देव म्हणतो; परंतु मनुष्य असे करत नाही. संतांनी दाखवलेल्या मार्गाने मनुष्य जात नाही. मग देवप्राप्ती आणि देवप्राप्तीचे सुख मिळेल कुठे.
देव प्राप्तीने जे सुख मिळते त्याला आपण अंतरतो कारण तोच सुखकर्ता तोच दुखहर्ता आहे. पण मनुष्य दुसरीकडेच भरकटत राहतो व शेवट पर्यंत भौतिक सुखात दु:ख भोगत राहतो.
खऱ्या देवाचा शोध आणि त्याची प्राप्ती हि परमार्थ केल्यानेच मिळू शकते. सूक्ष्म, अदृश्य, अतींद्रिय व अविनाशी सद्वस्तु पाहण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी बाळगणे हे खरे म्हणजे सगळ्या परमार्थाचे मर्म आहे. आपल्या या जगाला कर्मभूमी म्हणतात. येथील निसर्गनियम असा आहे कि जो कष्ट करतो त्याचे कर्म सिद्द होते व त्याचेच हेतू साध्य होतात. देवदर्शन हे आत्मज्ञान ज्ञान अनुभव असते. मनुष्याला येणाऱ्या अनुभवाने परमात्मरूप आकलन होते. खरा देव हा अतींद्रिय व अदृश्य आहे; जग हे मिथ्या आहे आणि आत्मा हे सत्य आहे. अशा या आत्म्याचा शोध संतांच्या संगतीत घेता घेता आपणास ज्ञान येवू लागते आणि यानेच खरा देव शोधता शोधता सर्व पंथ, संप्रदाय मागे पडतात आणि मग कल्पनेच्या कक्षेत थोडेफार ज्ञान येऊ लागते. त्यानंतर सूक्ष्म विवेक करतां करतां विचाराने त्याचे स्वरूप निश्चितपणे आकलन होते. त्यानंतरच साक्षात अनुभव येतो व खरा देव कोणता हे कळते. हि सगळी विचार आणि विवेक जागृतीची कामे आहेत.