As we all know work is worship thats why we say Yatn tochi Dev Janawa. your work is only God for you. dont betray with your work.
महत्वाचे मुद्दे:प्रयत्नाची कास धरली की परमेश्वर कृपा होतेच, भारतीय संस्कृतीतील प्रयत्नवादाचे दाखले. रामदास (Ramdas), तुकारा (Tukaram), कोलंबसातील (Columbus) दुर्दम्य आशावाद, वैज्ञांनिक संशोधन व त्यातील प्रयत्न, प्रयत्न न करणारी ऎदी माणसे कायमची दु:खी होतात, उज्ज्वल यशाची गुरुकिल्ली म्हणजे प्रयत्न.
ईश्वर विषयक अनेक कल्पना मानवात रूढ आहे. ईश्वर निर्गुण, निराकार आहे. असे म्हणत असतानाच काहींनी तेहतीस कोटी रुपांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. तरीही शेवटी ‘नेति नेति’ म्हणण्याचीच वेळ आली. असा हा परमेश्वर कोणाला प्रसन्न होतो? तर जो यत्न देवाची पूजा करतो त्याला. कवी यशवंत यांनी ‘ग्रहांचे साह्य शूराला यशश्री पायीची दासी’ असे प्रयत्न वादाचे वर्णन केले आहे. इंग्रजी भाषेत ‘work is worship ‘ अशी म्हण आहे. ईच्छित गोष्टी परमेश्वर कृपेनेच मिळतात. प्रयत्नां कास धरल्या नंतर परमेश्वर कृपा सुद्धा अशक्य राहात नाही. ‘यत्न तोच देव जाणावा’ असे रामदास स्वामी म्हणतात. नेपोलियनच्या मते अशक्य हा शब्द मुर्खाच्याच शब्द कोषात आढळतो. शहाणे लोक प्रयत्नांच्या बळावर ‘करीन ती पूर्व’ म्हणत असतात. आणि अशा प्रयत्न करणार्या भक्तांवरच परमेश्वर कृपा करतो. ‘god helps those who help themselves. ‘नसे राउळी वा नसे मंदिरी । जिथे राबती हात तेथे हरी ॥’ कवी श्रेष्ठ माडगूळकरांच्या या काव्यपंक्तीतही हाच आशय दडलेला नाही का ?
भारतीय संस्कृती प्रयत्नवादाचाच गौरव करते. असेच दिसून येते. म्हणूनच स्वत:च्या कठोर प्रयत्नाने आकाशीची गंगा अवनीतलावर आणून स्वत:च्या शापित पितरांना मुक्ती देणारे भगीरथऋषि अमर झाले. भक्त प्रल्हाद आणि ध्रुव यांनीही या अविरत प्रयत्नांच्या व आत्मशक्तीच्या बळावर अढळपद प्राप्त केले. मर्यादा पुरषोत्तम श्रीरामचंद्राने सागरावर वानरसेनेच्या सहाय्याने सेतूबंधन केले. बलसागर मारुतीने जलसागर उल्लंघिला. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केला. व हिंदूधर्म सांभाळला. हे अविरतच प्रयत्न होते. सावकाराच्या पदरी नोकर असलेल्या रामशागिर्दाने प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर पेशव्यांच्याच दरबारी न्यायधीशाचा मान मिळविला. ‘नर करणी करे तो नर का नारायण बनजाय’ म्हणतात ते याचमुळे.
प्रयत्नाचे महात्म वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात ‘असाध्य ते साध्य करीता कायास, कारण अभ्यास, तुका म्हणे ॥ हे शब्द प्रयत्नांचा महिमा सांगतात. हेच सूत्र लक्षात ठेऊन जगातील अच्च्युत शिखर सर करण्याचा विक्रम शेरपा तेनशिंग ने केला असावा. कोलंबसाने तत्कालीन सुवर्णभूमीच्या म्हनजेच भारताच्या शोधासाठी स्वत:चे जहाज पाण्यात लोटले. असंख्य हालअपेष्टांना तोंड देत. समुद्रातील वादळी वारे सहन करत ‘अनंत अमुची ध्येय शक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ असे सागराला बजावत, साथीदारांना धीर देत त्याने प्रदीर्घ प्रवास केला व तो एका नव्या अदृष्टपूर्व सृष्टीत येउन पोचला. (Anant Amuchi Dhey Shakti, Anant An Asha, Kinara Tula Pamrala)
आजपर्यंतच्या सर्व संशोधकांनी स्वत:च्या प्रयत्नांवर नितांत श्रद्धा ठेऊन अनेक शोध लावले. आणि मानव जातीला सुखाचा व समृद्धीचा मार्ग दाखविला. असाध्य रोगांवरही रामबाण औषधे, कृत्रिम अवयवांचे व हृदयाचे रोपण या सार्या गोष्टी म्हणजे यत्नदेवाचेच वरदान होय. मनोवेगाने प्रवास करण्याचे अतिमानवी सामर्थ्य, जिवंत मानवातील रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे आणि अतिसूक्ष्म पेशींचे चक्षुर्वैसत्य, असे ज्ञान मानवाने मिळविले आहे. ते देखील त्याच्या प्रदीर्घ प्रयत्नाचेच फलित होय. ब्रम्हांडातील कोणत्याही ग्रहांवर काय घडामोडी होत आहेत हे पाहण्याची मानवाला लाभलेली दिव्य दृष्टी म्हणजे या यत्न देवाचीच कृपा होय.
यत्न देव प्रसन्न झाला म्हणजे’ मूक करोति वाचालम्, पड्:गुं लंघयते गिरीम्। अशी अवस्था होते. त्यामुळे मुळ श्लोकांत थोडा बदल करून म्हणावेसे वाटते कि ‘ यत्कृपा तमहंवदे प्रयत्न परमेश्वराम् | ‘
काही ऎदी माणसे ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी,असा विचार करून स्वस्त बसतात.तर दैववादावर विसंबून राहणार्यां व्यक्ती’ साखरेचे खाणार त्याला देव देणार’ असे म्हणत आयत्या फळाची अपेक्षा करत निष्क्रिय राहतात. अशा व्यक्तींच्या वाट्याला नेहमीच दु:ख आणि दारिद्र येते.
जेथे प्रयत्न तेथेच सुबत्ता आणि ईश्वर वास करतो. ‘साहसे श्री प्रतिवसति’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेल ही गळे ‘हा समर्थांचा लाख मोलाचा उपदेशच आपल्या उज्ज्वल यशाची, समृद्धीची आणि शाश्वत सुखाची गुरुकिल्ली ठरू शकेल.