सरसगड किल्ला
सरसगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूख या गडावरून दिसतो. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जाणारा हा गिरिदुर्ग, रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे.इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद निजामशाहीचा संस्थापक कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले.शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे.