मलंगगड
इतिहास
ॲबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने १७८० मध्ये मलंगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैर्ऋत्येच्या व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यांस ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ॲबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ॲबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ॲबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावाने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून घेतला. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. मराठांची फौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या.मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला. शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायचे. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणाऱ्या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पायऱ्या दिसतात. पायऱ्यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पायऱ्यांनंतरच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फुटांचा एक पाईप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गडमाथ्यावर पोहचता येते. शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे.श्रीगणेश मंदिरसुद्धा आहे.आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. पूर्वेकडून नैर्ऋत्येकडे गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इर्शाळ, प्रबळगड हा परिसर दिसतात.