गुगलसारखी यापुढील क्रांती भारतातील आंत्रप्रिनर्स करतील असे गौरवोद्गार गुगलचे कार्यकारी अध्यक्ष एरिक श्मिड यांनी काढले आहेत. भारतावरील एका पुस्तकासाठी लिहिलेल्या लेखामध्ये श्मिड यांनी भारत इंटरनेटच्या बाबतीत सध्यातरी फार मागे असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेमध्ये १९९४मध्ये इंटरनेटची जी स्थिती होती ती आज भारतात असल्याचे सांगतानाच जर भारताने योग्य पावले वेळीच उचलली तर भारतातल्या उद्यमशील आंत्रपिनर्सकडून गुगलसारख्या अत्याधुनिक कल्पना वास्तवात आलेल्या आपल्याला बघायला मिळतिल असे ते म्हणाले.
भारतभरात इंटरनेटचा प्रसार वेगाने वाढला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर तसेच समाजावर अनुकूल परिणाम होईल असे ते म्हणाले. सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय वंशाच्या आंत्रपिनर्सचा भरणा असल्याचे सांगताना, अमेरिकेत नवे उपक्रम सुरू करणा-यांमध्ये भारतीयांचा वाटा तब्बल ४० टक्के असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
जर भारत न सोडता जागतिक स्तरावरील कंपनी सुरू करण्याची संधी त्यांना मिळाली तर भारतीय आंत्रपिनर्स काय करू शकतील याची कल्पना करा असे त्यांनी सांगितले. हे उद्योजक जग बदलू शकतात असे सांगताना, इंटरनेटला केंद्रीभूत ठेवून हजारो कंपन्या स्थापन होतील आणि केवळ भारतीय ग्राहकांना लक्ष्य ठेवून त्यांच्या आवडीनिवडींना प्राधान्य देणा-या साईट्स दाखल होतील असे स्वप्न त्यांनी रंगवले.
अर्थात हे सगळं एका रात्रीत घडणार नसल्याचे ते म्हणाले. जर भारताने योग्य पावले उचलली तर भारतीय आंत्रप्रिनर्स आधी भारताच्या समस्या सोडवायला प्राधान्य देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताची लोकसंख्या १.२ अब्ज आहे आणि मोबाईल फोन्सची संख्या ६० कोटी आहे. परंतु इंटरनेटच्या नियमित संपर्कात यापैकी अवघे १५ कोटी भारतीय असल्याचे श्मिड म्हणाले. दोन वर्षांपूर्वी भारतामध्ये इंडरनेट वापरणा-यांचे प्रमाण लोकसंख्येच्या ११ टक्के होते, जे विकसित देशांमध्ये ७० टक्क्यांच्या घरात आहे. चीनमध्ये हेच प्रमाण भारताच्या तिप्पटीपेक्षा जास्त म्हणजे ३८ टक्के असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले आहे. तर अन्य विकसनशील देशांमध्येही इंटरनेटचा वापर करणा-यांचे प्रमाण लोकसंख्येच्या २४ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे कुठल्याही निकषावर भारत हा इंटरनेटच्या वापराच्या बाबतीत पिछाडीवर आहे. जागतिक स्तरावर भारत हा आयटी व सॉफ्टवेअर हब म्हणून ओळखला जातो, परंतु इंटरनेटची परिस्थिती विपरीत असल्याचे त्यांनी दाखवून दिले.
ब्रॉडबँड वापरणा-यांची संख्या तर अवघी दोन कोटी असल्याचे श्मिड यांनी निदर्शनास आणले आहे. अर्थात भारत इंटरनेटच्या क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताने फायबर ऑप्टिकचे जाळे वाढवायला हवे असे सांगतानाच भारताने टू-जी कडून थ्री-जी व फोर-जीकडे लवकारत लवकर वळायला हवे असेही त्यांनी सांगितले.Indian entrepreneurs can build next Google: Eric Schmidt, Eric Schmidt said India must increase its Internet penetration across towns & cities, a move that will have a positive impact on its economy.