बेंगळुरूवरून हैदराबादकडे निघालेल्या एका खासगी व्होल्वो बसला बुधवारी पहाटे अपघातानंतर आग लागली. या आगीत ४५ प्रवासी होरपळून ठार झाले. ही आग इतकी भयानक होती की, सर्व मृतदेहांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यास अडचणी येत आहेत.
बसमध्ये ५0 प्रवाशांसह एकूण ५२ जण होते. बसचालक फिरोज खान तसेच क्लिनरसह पाच प्रवाशी आग भडकण्यापूर्वी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. ही बस गत रात्री ११ वाजता बेंगळुरूवरून रवाना झाली होती.
खासगी बस ऑपरेटरकडे ऑनलाईन बुकिंग केलेल्या केवळ ३३ प्रवाशांची यादी आहे. अन्य प्रवासी यानंतर बसमध्ये चढले असावेत, अशी शक्यता आहे. अपघातातून सुदैवाने बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, आग लागली तेव्हा सर्व प्रवासी झोपलेले होते. आमच्यापैकी काहींनी खिडक्यांचा काचा फोडण्याचे प्रयत्न केले मात्र आम्ही अपयशी ठरलो. मी लगेच आपत्कालीन खिडकीकडे वळलो आणि ती तोडून बसमधून उडी घेतली.असा झाला अपघात
हैदराबादपासून सुमारे १४0 किमी अंतरावर बेंगळुरु -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील पलेम गावानजीक पहाटे ५ वाजून १0 मिनिटाला हा अपघात झाला. बसची डिझेल टाकी एका पुलाला धडकली आणि फुटली. यामुळे आग भडकली. काही कळायच्या आतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.ओळख पटविणे कठीण
आगीत होरपळलेले मृतदेह अक्षरश: कोळसा झालेले आहेत. मृतदेह महिलेचा आहे की पुरुषाचा हे ओळखणेही कठीण आहे. डीएनए तपासणी तसेच कुटुंबीयांच्या रक्त नमुनांच्या तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटेल. त्यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांना सोपवले जातील.पंतप्रधानांना दु:ख
नवी दिल्ली : पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या अपघातात ४५ प्रवासी ठार झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी कामना त्यांनी केली.अपघातावेळी बसचा वेग जास्त असावी. त्यामुळे त्याची डिझेल टाकी पुलाला धडकली.

















