laughing the best, laughing is the art of Life.
महत्वाचे मुद्दे: विनोद मानवी स्वभावावरील प्रभावी औषध विदुषकीय परंपरा म्हणजे विनोदाची साहित्यिक परंपरा स्वत:वर केलेला विनोद श्रेष्ठ दर्जाचा विनोद बेचव जीवनात चव निर्माण करतो.
“औषधेश्र्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्तिह । स्वाधिनं सुलभंचापि आरोग्यानंद वर्धनम्”।
सर्व औषधां मध्ये हास्य हेच श्रेष्ठ औषध मानले जाते. ते आपल्या स्वाधीन असलेले, मिळण्यास सुलभ असून आरोग्य व आनंद वाढवणारे अदभूत रसायन आहे. तेव्हा हास्याचे उगमस्थान असणाऱ्या विंनोदाचे महात्म्य काय वर्नावे!
पूर्वीपासून राजेरजवाडयांच्या पदरी विदुषक असत. मनावरील ताण कमी करण्यासाठी विदुषक विनोदी संभाषण करून राजेलोकांचा शिण घालवत असत.त्यांचे मनोरंजन करीत असत. संस्कृत साहित्यात विदूषकाचे स्थान फार मोठे होते.
त्यानंतर परकीय आक्रमनांच्या धुमश्चक्रित प्रत्येक जण विनोद विसरला. शिवाजीराजांनी आज्ञांपत्रात अधिकार्यांना सूचना देतांना ‘विनोदाचे व्यसन जरा कमीच असावे’ अशीही सूचना केलेली आहे. तर श्री समर्थ रामदासस्वामींनी ‘ टवाळा आवडे विनोद ‘असे म्हटले आहे. याच काल खंडात उच्चभ्रू समाजातून विनोदाचे उच्चांटन झाले व तो कनिष्ट समाजात रुजला. विनोदाने वगनाट्यात स्थान मिळविले. दिवस भर कष्टकरून थकले-भागले लोक विरंगुळा म्हणून रात्री निवांतपणे दोन घटका लोकनाट्यातील सोंगाड्याचे विनोदी संवाद ऐकण्यास जाऊ लागले.
* जीवन हि सुख-दु;खाची जाळी, त्यात अडकले मानव कोळी, एकाने दुसर्यास गिळावे हाच जगाचा न्याय खरा’. जगण्यासाठी रोज मरणप्राय दु;ख भोगत असताना हे दु;खमय जीवन सुसह्य करण्यासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं.वि.जोशी, प्र.के.अत्रे, पु. ल. देशपांडे, या सारख्या साहित्यिकांनी वाड्मयाद्वारे फार मोठी मोलाची मदत केली.
* आयुष्यात रस निर्माण करण्याचे कार्य तर विनोद करतोच. पण विनोद हे एक असे प्रभावी अस्त्र आहे कि त्याच्या सहाय्याने समाजातील वाईट रूढी,अंधश्रद्धा यांचेही उच्चाटन करता येते. साहित्य -बत्तिसी, सुदाम्याचे पोहे ईत्यादी लेख संग्रहाद्वारे श्रीपाद कृष्ण कोल्ह्टकरांनी समाजातील दोषदिग्दर्शन केले. प्र.के. अत्रे उर्फ केशव कुमारांनी ‘ झेंडूची फुले ‘ या काव्य संग्रहाद्वारे आणि जयवंत दळवींनी ‘ ठणठणपाळ ‘ या विनोदी लेखमालेद्वारे साहित्यक्षेत्रातील अपप्रवृत्तींचा खरपूस समाचार घेतला.
* चिं. वि.जोशींचे ‘चिमणरावांचे चऱ्हांट’ ‘पुन्हा चिमणराव’ इत्यादी विनोदी लेख निखळ आनंद देवून जातात. रा. ग.गडकरी यांनी ‘ बाळकराम ‘ या टोपणनावाने केलेले लेखन हे साहित्यातील उच्च कल्पकतेच प्रतिनिधित्व करते.
* आजच्या धकाधकी च्या यंत्रवत जीवनात देखील काम करता करता मनाचा ताजेपणा टिकवण्यासाठी सदानंद चांदेकर, हुल्लड मुरादाबादी यांच्या विनोदी संवादाच्या ध्वनिफीती लाउन कामाचा ताण कमी केला जातो . दादा कोंड्क्यांची द्व्यर्थी गीतेही ग्राम्य विनोद निर्माण करून ग्रामीण जनतेला दिलासा देतात.
* विनोद हे दुधारी शस्त्र आहे. म्हणून स्वत:वर केलेला विनोद सर्वात उच्च दर्जाचा असतो. असे विनोद लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रे ‘ या आत्मचरित्रात आढळतात. जो जीवनातील विसंगती, विकृती यांच्या कडे दयाबुद्धीने पाहतो तो विनोदी माणूस होय. विनोद करण्यासाठी माणूस सहृदय असावा लागतो. प्रसिद्ध लेखक ना.सी. फडके यांच्या मते एखाद्या कर्मठ माणसापेक्षा विनोदी माणसाचे महत्व केव्हाही जास्त आहे. कारण तो समाज निरोगी राखतो.
* इंग्रजी वाड्मयात सुद्धा विनोदाला फार मोठे स्थान आहे.चार्ली चे चित्रपट त्यांतील विनोदामुळेच फार लोकप्रिय झाले आहे. श्री. बाळ ठाकरे आणि आर.के. लक्ष्मण यांच्या सारखे व्यंगचित्रकार राजकारणातील घडामोडीवर नेमके बोट ठेऊन राजकारणाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात.
* विनोद हा बेचव जीवनाला चव आणतो. माणूस विनोदाशिवाय जगू शकत नाही. हास्य ही त्याची सहज प्रवृत्ती आहे. माणसाची व्याख्याच ‘ हसणारा प्राणी’ अशी केली आहे. जीवनातील दु:ख, राग, द्वेष इत्यादी रिपूंवर हास्य हा रामबाण उपाय आहे.